Sunday, September 2, 2018

चवी चवी ची गोष्ट

एकदा पदार्थ उत्तम चवीचा कधी बनतो? आवश्यक ते सारे घटक योग्य प्रमाणात असले की, कधी थोडासा ट्विस्ट दिला की आणि दिलसे बनवला की!
फोडणीची पोळी या सारख्या साध्या सोप्या पदार्थाला ही हे लागू होते का? हो तर....अगदी वरणभाताला सुद्धा!! योग्य प्रमाणात शिजलेला वाफाळता भात हवा, नीट घोटले गेलेले मीठ साखर किंवा गूळ घालून सारखे केलेले वरण हवे, शक्य तितके ताजे घरच्या लोण्याचे कढवलेले तूप योग्य प्रमाणात हवे, लिंबाची फोड सोबत पानात हवी, एखादा पापड असेल तर अजून उत्तमच !

पोळी पुरेशी शिळी आहे ना? दाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, ओला नारळ सहज हाताशी आहे ना? नॉर्मलपेक्षा एक लेव्हल वर तिखट झालीये ना? त्याचा तोल सांभाळणारी चिमूटभर साखर आणि चमचा भर दही अचूक प्रमाणात वापरलंय ना? दही वापरून चव वेगळी येईल, तीच चव लिंबू वापरून वेगळी लागेल... थोडे भान ठेवावे लागेल की दही घालायचे असेल तर वाफ आणण्याआधी, पण लिंबू पिळायचे असेल तर एक पाण्याचा हबका देऊन, वाफ आणायची, मग आच बंद करून काही सेकंदानी लिंबू पिळायचे. ( चीनी-कम मधला अमिताभ आठवा किचन मधल्या कूक्स चे बौद्धिक घेताना) सोबत काहीतरी दह्याचे असायला हवे. मठ्ठा किंवा दह्यातील कोशिंबीर. जे चवीचा ट्विस्ट देईल, पदार्थ खाताना कोरडेपणा दूर करेल.

हे सारे असे मिळून आले आणि दिलसे बनवले की कोणताही पदार्थ उत्तम बनतोच!

जी बनवणारी असते ना तिच्या मनातले भाव फार महत्त्वाचे! कोंड्याचा मांडा करणे ही कला आहे. तिचे आतून समाधानी असणे हे त्या पदार्थात ही उतरते. तिच्या मनात जेंव्हा समृद्धी असते तेंव्हा ती त्या पदार्थास ही लाभते. समृद्धी म्हणजे महागडे उंची पदार्थ नव्हेत, फोडणीची पोळी किंवा कांदे पोहे बनवताना त्यात काजू नाही घालणार, तिथे योग्य तेवढे भाजले गेलेले दाणे च हवेत, पण म्हणून पुलाव, शिरा, उपमा शेंगदाणे घालून नाही बनवणार त्यात शक्यतो काजूच हवेत तर पातळ पोह्याच्या चिवड्यात हे दोन्ही! समृद्धी म्हणजे जेजे आवश्यक ते सारे सहज उपलब्ध असणे, पण ते तसे नसले तरी बनवणारीच्या हाताची चव ती कमी लक्षात सुद्धा येऊ देत नाहीत ते खरे समृद्धीचे लक्षण. मनापासून बनवणे आणि त्याहून आनंदाने आपला, परका, घरचे बाहेरचे असा भेदभाव न करता तिला ते बनवून खाऊ घालण्यात आनंद वाटणे हे समृद्धीचे लक्षण!!!

जेंव्हा असे घडते तेंव्हा साधासा पदार्थ ही तृप्त करून टाकतो, जिभेवरची चव रेंगाळत राहते.