Sunday, April 15, 2018

सपनोंकी नगरीसे भाग २

मी देवाचे खूप आभार मानते की सतत चालणारे डोके मला दिल्याबद्दल. कधीकधी मीच अचंबित होऊन जे जे विचार जी स्वप्ने माझ्या डोक्यात उगवतात त्याकडे पहात राहते. स्वप्नांच्या गोष्टी चालू आहेत आणि खाणे, खिलवणे या बद्दल चा हा माझा ब्लॉग आहे म्हणून त्या विषयापुरतेच इथे लिहीन. आधी म्हंटले तसे हे दुसरे स्वप्न ही तितकेच हटके आहे. सध्याच्या काळात ती गरज ही खूप मोठी आहे. अजूनतरी माझी त्यातील उडी माझ्या बहिणीच्या दोन्ही मुलांच्या वेळेस जेजे शक्य झाले ते करणे एवढीच ठरली आहे, पण म्हणून तो विचार डोक्यातून गेलेला नाही. कदाचित हा विचार दुसऱ्या कोणी अमलात आणून स्वतः असे काही सुरु केले तरी हरकत नाही. 

छोट्या कुटुंबात किंवा जिथे तरुण जोडपेच घरात राहते, जे बाकीच्या कुटुंबियांपासून दूर राहतात, दोघेही नोकरी करतात अशावेळी नव्या जीवाची जेंव्हा चाहूल लागते ती घटना आनंदाची खरी पण भांबावून टाकणारी आणि गडबडवुन टाकणारी असते. काय करावे, काय करू नये ह्याची माहिती मिळवता येते, गर्भसंस्कार, योगा, वेगवेगळे डॉक्टर्स त्यांचे सल्ले उपलब्ध असतात, पैसे मोजून ते घेऊ शकतो. एकीकडे स्वतःची सतत बदलत राहणारी स्थिती, सतत मिळणारे सल्ले विशेषतः खाण्या पिण्याचे, ऑफिसमध्ये कामाचा गाडा ओढणारी ती तरुणी या साऱ्यात एक प्रकारे त्रस्त असते. कळते पण वळत नाही हे कसे याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही अवस्था. उत्तम आहार हा बाळाच्या पुढील आयुष्याचा पाया आहे हे कळते, पण कधी ते बनवताच येत नसते, कोणी तसे बनवून खाऊ घालणारे सोबत नसते, कधी वेळ नसतो तर कधी उरक नसतो. 

अशावेळी असे घडले तर एकदा का प्रेग्नन्सी नक्की झाली की त्या तरुणीच्या आहाराचा ताबाच कोणीतरी घेईल. कॅल्शियम, लोह आणि प्रथिने यांचा नीट विचार करून, पथ्य, कुपथ्य, ऋतूंचा विचार करून आपले जेवण बनवेल आणि आपल्याला आयते ते समोर ठेवेल. अगदी आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये आणून देऊन. जे खूप काळजीपूर्वक बनवलेले असेल, उत्तम पोषणमूल्य जपणारे असेल, जिन्नस आणि कृती यात कोणतीही तडजोड न करता बनेल आणि कमीत कमी वेळात आपल्यापर्यंत पोचेल.
असेही घडते की बाळ घेऊन ती तरुणी घरी येते. चौकोनी कुटुंब असते, किंवा राजा राणीच्या संसारात सासू किंवा आई तात्पुरती येऊन राहिलेली असते. ह्या मुलीचे करणे, बाळाचे सर्व करणे, आले गेले बघणे आणि तेही दुसऱ्या ठिकाणी येऊन. खरेतर ती आई किंवा सासूच जास्त भांबावून गेलेली असते. पुन्हा काय करावे, करू नये, काय खावे खाऊ नये यातील वैचारिक मतभेद असतातच.
त्यापेक्षा असे झाले तर - कोणीतरी छानसा पथ्याचा डबा रोज घरी पाठवला तर, सूप, पालेभाजी, भाकरी, ताक, मुगाचे वरण, किंवा खिचडी, आंबोळी, शिरा, कोशिंबिरी, घरच्यासारखे साजूक तूप हे किंवा काही स्पेसिफिक जे डॉक्टरांनी सुचवलेले आहे ते जर रोज कोणी घरी पाठवू लागले तर? ती तरुणीच काय पण अशी आई किंवा सासू सुद्धा ते आनंदाने खाऊ शकेल, तिचे श्रम वाचतील ते वेगळेच. तिचा वेळ लेक/सून  आणि नव्या नातवंडा साठी नीट कारणी लागेल ना? 

हा विचार पुढे अजून वाढत गेला, की नुसते जेवणच का अळीव, डिंकाचे लाडू, बाळंतिणीची सुपारी किंवा अगदी सकाळी खाण्याची सुंठ गोळी ही बनवून येता येऊ शकेल. हे सारे स्वस्त नाही मिळणार, घरी एवढ्या पैशात किती सारे बनेल हा विचार इथे काम नाही करू शकणार, चितळ्यांकडे ४०० रुपये किलो डिंक लाडू मिळतात मग तुम्हाला ५०० रुपये का मोजायचे हा प्रश्न निरर्थक ठरेल, ताजे तूप कढवून, लगेच तेच तूप वापरून नुसते खोबऱ्याचा आणि खारकेचा भडीमार ना केलेले लाडू, सोबत सुंठ, केशर, पिंपळी, जायफळ असे औषधी घटक वापरून निगुतीने केलेल्या पदार्थाची किंमत बाहेरच्या तुलनेत जास्तच असणार. ५०० रुपयांचा एका वेळी दोन माणसांना पुरणारा पिझ्झा आणि असे बनवलेले ५०० रुपयात आलेले ३५/४० लाडू यांची तुलना होऊ नाही शकत!
स्वप्नांबद्दलच बोलत आहे आणि विषय नव्या बाळाच्या स्वागताचा चालू आहे, तर थोडे वेगळे अजून एक स्वप्न होते. माझी एक मैत्रीण आहे जी छोट्या मुलांचे कपडे अतिशय सुरेख शिवते, माझ्या घरात, ओळखीत जी नवी बाळे आली त्या साऱ्यांचे कपडे तिने शिवले. आणि त्यासाठी अनेकदा माझ्या कॉटन साड्या आणि ओढण्या कामी आल्या. बाळ जन्माला येण्याच्या कित्येक दिवस आधी मी तिच्या मागे लागून, झबली, टोपडी, दुपटी अगदी लंगोट देखील बनून तयार असत.

बाजारात तयार कपडे मिळतात, एकतर ते खूपच महाग असतात, अनेकदा मोठे असतात त्यामुळे माझी कायम पसंती स्वातीकडून कपडे शिवून घेणे ही राहिली,  आणि म्हणूनच हा विचार अनेकदा माझ्या साठी म्हणून नव्हे (माझा आणि शिवणकामाचे अजिबात नाते  नाही ) की का ती असा एक व्यवसाय सुरु करत नाही ज्यात की बाळ होण्याच्या तारखेआधी काही दिवस असा पूर्ण निगुतीने शिवलेला सुती कपड्यांचा सेट बनेल आणि घरी पोचेल, दोन तीन वेळा आधी छान धुतले जाऊन कपडे मऊसूत बनतील आणि बाळ येण्याच्या आधी अशी बॅग त्याच्या स्वागतास तयार असेल.

Saturday, April 14, 2018

सपनोंकी नगरीसे भाग १

हजारो स्वप्ने मी मनात सोबत घेऊन फिरत असते. काही तात्कालिक असतात काही खोलवर जपलेली. त्यातली काही म्हणजे मला खाद्यपदार्थांच्या दुनियेत काहीतरी हटके करायचे आहे.  तसे पाहायला गेले तर माझ्या आत्याचा उज्ज्वला मराठे हिचा एक उत्तम सेट झालेला केटरींगचा व्यवसाय होता. उत्तम चव तिच्या स्वतःच्या हाताला आहे, व्यवसायासाठी पदार्थ बनवताना  दर्जात कोणतीही तडजोड ती करत नसे, त्यातूनच ती एक प्रस्थापित नाव बनली होती. तिलाच जॉईन करून हळूहळू तोच व्यवसाय पुढे चालू ठेवणे मला सहज शक्य होते. थोडासा प्रयत्न्न आम्ही दोघीनींही कदाचित केलाही होता. पण तेंव्हा कदाचित घर संसारात रमण्याची जास्त इच्छा होती, आणि सर्वात वाईट कदाचित हे होते कि असा व्यवसाय तुम्हाला सणावारी व्यस्त ठेवतो. ज्याची माझी तेंव्हा तरी कदाचित तयारी नव्हती. म्हणजे गणेशचतुर्थीच्या दिवशी घरी १५/२० माणसे जेवायला असताना, १०० एक मोदक बनवणे वेगळे, जे करायची माझी तयारी होती पण ते सोडून त्या दिवशी व्यवसायात गुंतून तिथे ५०० मोदकांची ऑर्डर आहे म्हणून भल्या पहाटेपासून राबणे मला बहुधा मान्य नव्हते. त्यामुळे तो प्रयत्न्न फार पुढे गेला नाही.

पुढे वेगळ्याच वाटेवरचे करिअर सुरु झाले. पण हे स्वप्न कधीही मनातून गेले नाही. असे म्हणतात की तुम्ही कितीही वाटा बदला तुमचे वाटे बदलत नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या स्वरूपात हा धागा कायम सोबत असतो. त्यातूनच इन्फोसिस मध्ये  फूडकोर्ट मधील सँडविच बनवणाऱ्याला ते बनवायला शिकवणे, कलिग्जना रेसिपी सांगणे, केपीआयटी मधल्या कॅन्टीन वाल्याने बनवलेले थालीपीठ खाऊन " अरे बाबा, एखाद्या महाराष्ट्रीयन माणसाकडून आधी बनवायला शिक, किंवा शेवभाजी एखाद्या खान्देशी हॉटेल मधली खाऊन ये नाही तर मला विचार कशी बनवायची ते " असे सांगणे असे मजेशीर प्रकार सतत घडत असतात. दर काही दिवसांनी आपण पॉटलक पार्टी करूया असे टीम ला म्हणणारी ही मीच असते. अनेकदा कॅन्टीन मध्ये बनणारे पदार्थ परफेक्ट चवीचे नसतात, काही तरी कमी, काही तरी जास्त असतेच, तेंव्हा मनात विचार येतो तिथे फूड टेस्टर म्हणून आपण काम करावे.
एकेकाळी मॅकडॉनल्ड चे आउटलेट सुरु करायचे स्वप्न होते, कधी मला ऑफिसच्या फूड कोर्ट मध्ये सूप्स अँड सलाड बार सुरु करायचे स्वप्न असते, आज अनेक आऊटलेट्स पुणे, ठाणे डोंबिवली अशा ठिकाणी दिसतात जी महाराष्ट्रीयन पदार्थ उत्तमरीत्या बनवून खाऊ घालतील. सुरुवातीला जेंव्हा उसळ भाकरी किंवा पिठले भाकरी एवढीच त्यांची कक्षा होती तेंव्हा मला असे काहीसे सुरु करून त्यात डाळ ढोकळी, फोडणीचा भात, फोडणीची पोळी आणि सोबत मसाला ताक, उत्तम चवीचा मसालेभात आणि अळूची भाजी, सांज्याची पोळी, तांदळाची उकड, आंबोळी  असे थोडे हटके पदार्थ तिथे ठेवण्याचे स्वप्न होते.

अजूनही मनात इच्छा आहे फक्त पुरणपोळी आणि मोदक बनवून देण्याचा व्यवसाय सुरु करण्याची , अगदी असे पदार्थ बनवून देणाऱ्या अनेक जणी आसपास असूनही. हाताची चव आणि सोबत राखलेला दर्जा ह्याचे सार्वत्रीकरण होऊ शकत नाही.
अलीकडेच दोन विचार मनात घोळत आहेत. पहिला म्हणजे आता काळानुरूप आसपास वृद्धांची संख्या वाढत जाणार, त्यांचे एकटेपण, सोबत कोणी नसणे हे सारे वाढत जाणार पर्यायाने वृद्धाश्रमांची संख्या ही वाढणार. माणसे अडगळीत टाकल्यासारखे हे वृद्धाश्रम नसू नयेत हे कोणालाही सहजच वाटेल. असा एखादा वृद्धाश्रम असेल जिथे सारी नीट व्यवस्था असेल. त्यांच्या खाण्यापिण्याची नीट सोय असेल. असा विचार मनात येतो की शेवटी तिथे त्यांच्या खाण्यापिण्याची सोय बघणारी, ते बनवणारी ठराविक माणसे असतील, तेच तेच ठराविक पदार्थ बनवून दिले जात असतील. साधारण तीच चव बनत असेल. या माणसांना सुट्टी देणे हा ही एक त्या व्यवस्थापनापुढील प्रश्न असत असेल कारण सगळे एका वेळी सुट्टीवर जाऊ शकत नसतील, सणावारी हा प्रश्न जास्त मोठा बनत असेल.
मनात विचार आला तो हा की का एखाद्या वृध्दाश्रमाशी मी जोडली जाऊ नये. आठवड्यातून एक दिवस तिथे जावे, त्यांना वेळ द्यावा, पुस्तक वाचून दाखवावे, गप्पा माराव्यात. हळू हळू एक कंफर्ट निर्माण झाला की स्वतः घरी बनवून त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन जावे. किंवा  तेथील स्वयंपाक घरातील माणसांना सुट्टी द्यायला सांगून आपल्याला तेथील कोणीतरी मदतीस घेऊन आपणच त्यांच्यासाठी काहीसे वेगळे पण त्या मंडळींना चालेल असे जेवण बनवावे.
जिथे ३६५ दिवस दिवसाचे तीन किंवा चार वेळेचे खाणे मोठ्या प्रमाणात बनते तिथे वेगळे काही बनणे थोडे कठीण असत असावे अशी माझी कल्पना आहे. परवा ऑफिस टीम साठी कैरीची डाळ आणि पन्हे बनवून नेताना मनात आलेला हा विचार आहे. कि  एखाद्या चैत्रातील रविवारी मी अशा एखाद्या ठिकाणी जाऊन दुपारी त्यांच्या साठी असे डाळ -पन्हे का बनवू नये, आणि ते खाऊन तृप्त त्यांना होताना पाहू नये. मग हे विचार पुढे वाढतच गेले आणि सदर पदार्थांची यादी ही. 

आज तरी हे स्वप्न आहे कारण दिवसाचे १० तास ऑफिसला जाणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीवर आपले वृद्धाश्रमाचे स्वयंपाकघर काही काळ का होईना कोण ताब्यात देईल मला माहीत नाही. पण स्वप्न तर बघायलाच हवीत तेंव्हा ती पुरीही होतील एक ना एक दिवस हे खरे ना?

पौष्टिक लाडू

अनेकदा मी पोहे, डाळे, डिंक आणि थोडे पिस्ते व बदाम ह्याचे लाडू बनवते. कसे तर पोहे व डाळे  कोरडे भाजून पूड करणे, डिंक थोड्या तुपात तळून घेणे. बदाम आणि पिस्ते यांची पावडर करून घेणे, हे सारे एकत्र करून, त्यात वेलचीपूड, गरजे नुसार थोडे तूप आणि पिठीसाखर घालून लाडू वळून ठेवणे.
आज लाडू बनवणे मनात होते, साधारण असेच काहीसे डोक्यात ही होते पण तरीही करावयास घेई पर्यंत नक्की होत नव्हते. शेवटी जे बनले ते असे -

प्रत्येकी एक वाटी पोहे आणि डाळे तळून घेतले.
२५ ग्रॅम डिंक तळून घेतला.
२ चमचे मेथ्या तळून घेतल्या.
४ चमचे खसखस भाजून घेतली.
अर्धी वाटी खारीक पूड अगदी बारीक केलेली घेतली.
अर्धी वाटी मुगाचे पीठ तुपात चांगले भाजून घेतले.

तळून घेतलेल्या सर्व गोष्टी गार झाल्यावर मिक्सरमधून बारीक करून घेतल्या. मुगाचे भाजलेले पीठ गार होऊ दिले. त्यात सर्व बारीक करून घेतलेले जिन्नस घालून मिसळून घेतले, वेलचीपूड घातली आणि लाडू वळले. हे सारे करताना जे जसे डोक्यात आले तसे करत गेले त्यामुळे तयार लाडवांखेरीज कशाचाही फोटो नाही. पदार्थ करताना अनेकदा एकच विचार डोक्यात असतो तो म्हणजे याचे आहारमूल्य कसे वाढवता येईल. अर्थातच ओट्यावर कोणते आहारशास्त्रावरचे पुस्तक लागत नाही आणि तसे नसतेही. पण डोक्यात काही सूत्रे असतात. कॅल्शिअम, प्रोटिन्स याचा विचार सतत असतो. मला स्वतःला गोड पदार्थ आवडतात. माझ्या माणसांनाही आणि नशिबाने तरी अजून ते खाण्यावर निर्बंध घालावे ही वेळ आलेली नाही एक वजनाचा काटा जे दर्शवितो त्या खेरीज. याखेरीज माझी स्वतःची फार तीव्र चवी नसलेले पदार्थ हि एकच आवड आहे. त्यामुळे बऱ्याचदा साधे सोपे सात्विक आणि पौष्टिक पदार्थ बनवण्याकडे कल असतो.

आता बघुयात हे जे लाडू बनले त्यांचे पोषण दृष्ट्या मूल्य कितपत चांगले आहे ते.
खारीक आणि डिंक हे स्नायू आणि हाडांचे पोषण करतात. डिंक कॅल्शिअम चा पुरवठा करते. हाडे आणि सांधे याकरिता डिंक आणि खारीक दोन्ही उत्तम.
डाळे आणि मुगाचे पीठ प्रोटिन्स चा चांगला पुरवठा करतात.
मेथ्या नको असलेले कॅलेस्टरॉल कमी करतात तसेच पचनास मदत करतात. तळून त्याचा कडवटपणा थोडा कमी होतो.
पोहे पचायला हलके आणि कार्बोहैड्रेट्स चा स्रोत.
खसखस त्वचा आणि हाडांसाठी चांगली.
यात साखरेऐवजी गूळ वापरावा का हा विचार होता कारण अनेकदा डिंक लाडू बनवताना मी गूळ वापरते पण यावेळी कसे लागतील असा प्रश्न पडला आणि म्हणून पिठीसाखर वापरणे मी पसंत केले.
जेवढे तूप मुगाचे पीठ भाजण्यासाठी आणि इतर जिन्नस टाळण्यासाठी वापरले (१०/१२ चमचे)  त्याहून अधिक तूप वापरण्याची गरज लागली नाही. वरील साहित्यात असे २० लाडू बनतात.
सकाळी एक लाडू आणि एक ग्लास दूध ही उत्तम न्याहारी असू शकते.

Thursday, April 5, 2018

टोमॅटोची चटणी : (पंच फोरन )

साहित्य : तीन मध्यम आकाराचे छान लाल पण घट्ट टोमॅटो, पाव  चमचा मेथी दाणे, अर्धा चमचा बडीशेप, एक मूठ बेदाणे मध्ये चिरून, ३ तिखट लाल मिरच्या, २ पाने तमालपत्र, अर्धा इंच दालचिनी, २ चमचे तेल, मीठ

कृती : टोमॅटो धुऊन कोरडे करून बारीक चिरून घ्या.

फोडणीचे सर्व साहित्य काढून ठेवा

बेदाणे चिरून ठेवा
कढईत तेल मध्यम आचेवर गरम करून घ्या
त्यात मेथीदाणे , बडीशेप, दालचिनी , तमालपत्र आणि लाल मिरच्या या क्रमाने घालून फोडणी करून घ्या.
बेदाणे घालून थोडे परतून घ्या.


चिरलेला टोमॅटो घालून झाकण ठेवून कमी आचेवर एक वाफ येऊ द्यात.

पुन्हा परतून त्यात मीठ घाला, हवी असल्यास थोडी साखर घाला. (बेदाण्यामुळे गोड चव आधीच आलेली असते)
पाणी सुटेल, परतून ते आटू द्यात.
चटणी किंवा भाजी म्हणून खाता येते. मेथी, बटाट्याच्या किंवा कोणत्याची पराठ्यासोबत जास्त चांगली लागते.

लागणारा वेळ : २० मिनिटे
२/३ व्यक्तींसाठी